पिंपरी चिंचवड – मी 1991 मध्ये खासदारकीला उभा होतो, तेव्हा लोणीकंदमध्ये स्वस्तात जमिनी मिळत. पुढे-मागे आपलाही पेट्रोल पंप असावा, म्हणून मी विकत घेतला. माझेही पंप वाघोली, लोणी काळभोर येथे आहेत. त्यावेळी पेट्रोलमध्ये भेसळीचं प्रमाण जास्त होतं. उद्या कुठे भेसळ झाली तर अजित पवार भेसळ करायचा अशी बोंब व्हायची आणि माझीच बदनामी व्हायची, त्यामुळे मी तो पंप चालवायला दिला” असा किस्सा सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हशा पिकवला.. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चिंबळी भागात खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला अजित पवार उपस्थित होते.
लोकांचा विश्वास हा खरेदी विक्री संघ, दूध संघाच्या पंपावर असतो, कारण इथे भेसळ होणार नाही, असा विश्वास असतो. त्यामुळे तिथे ग्राहक जास्त असतात. आता भेसळीचं प्रमाण जवळपास संपलं आहे, कारण नवीन तंत्रज्ञान आलं आहे. तो टँकर कुठे थांबला, किती वेळ थांबला, काय गडबड झाली, हे समजतं. सीसीटीव्ही कॅमरा असतात, बारकाईने लक्ष असतं, त्यामुळे भेसळीचं प्रमाण कमी झालंय. पण काही ठिकाणी चिप बसवून पेट्रोल-डिझेल कमी दिलं जातं, काही ठिकाणी लिटरला थोडंसं कमी पेट्रोल देतात, मात्र हा पंप गडबड करतोय, असा लोकांच्या लक्षात आलं, लूट होत असल्याचे समजले की त्या पंपाकडे कोणी फिरकत नाही, असे अजित पवार सांगत होते.
सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आता पेट्रोलचे दर शंभरीपार गेले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, एवढे झपाट्याने हे दर वाढत आहेत, पण वाहनं तर घ्यावीच लागतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं की एक वाहन फक्त 15 वर्ष वापरायचं, 15 वर्षांनी ते वाहन स्क्रॅपमध्ये गेलं पाहिजे. असा नवा नियम आला आहे. नाहीतर आपल्या इथे किती तरी वर्ष वाहनं वापरणारे लोक आहेत, अशा कोपरखळ्या अजित पवारांनी मारल्या.