मुंबई : राज्यातील पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र येण्याचा मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळत असून, भाजपचा दारूण पराभव झाला आहे. पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केला, असा टोला पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने फडणवीसांना लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारला अमर अकबर अँथनीचे सरकार म्हणून भाजपाने हिणवले. मात्र अमर अकबर अँथनी हा सिनेमा जसा हिट ठरला अगदी तशाचप प्रकारे विधानपरिषद निवडणुकीत आमची आघाडी हिट ठरली आणि रॉबर्टसेठचा पराभव झाला, असा जोरदार टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला लगावला आहे.
आणि रॉबर्ट सेठचा दणदणीत पराभव झाला….. pic.twitter.com/JVBAgCLfUs
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 4, 2020
विधान परिषदेच्या निकालावर बोलताना सचिन सांवत म्हणाले की, भाजपच्या रूपाने लोकशाही समोर मोठे संकट उभे आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. या गरजेतूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून आजचा निकाल हा या तीन पक्षाच्या एकोप्याचे फळ आहे.
मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपासाठी ही मोठी चपराक असून दोन दिवसांपूर्वीच १०५ चे १५० होतील अशा वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा भ्रमाचा भोपळा या निकालामुळे फुटला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
विदर्भातील आपला गड फडणवीसांना सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडत आहेत, असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला.