पंढरपूर : भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील हा विश्वास आहे. भगीरथ भालके यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रचार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी व्हिडीओ शेअर करत भगीरथ भालके यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भगिरथ भालके निवडणूक लढवित आहेत. दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक लागली आहे. भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं.@NCPspeaks pic.twitter.com/ylYQzj2qmu
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 15, 2021
कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका देखील केली.
महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे. भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा, असे आवाहन त्यांनी केले.