मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि आता खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ईडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप प्रिय ईडी, एकदा मेहता, बापट आणि दरेकरांकडे एखादा कप कॉफी घ्यायला जा, नाही तर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या लोकं ‘सनम बेवफा’ म्हणतील, अशी उपरोधिक टीका मिटकरी यांनी ट्विट करत केली आहे.
नोट बंदी झाल्यानंतर जय अमित शहा यांच्या कंपनीकडे जे 90 करोड रुपये होते, नोटबंदी नंतर 700 करोड रुपये जमा झाले. ही माहिती आजपर्यंत तू का दिली नाहीस गं ? कधीतरी त्यांच्या घरी जाऊन पण समन्स बजावत जा ! मग वाटेल तू भाजपाची गुलाम नाहीस, अशी बोचरी टीका मिटकरी यांनी केली आहे.
देशात हजारो कोटी चे घोटाळे करणार्या भाजपच्या नेते मंडळींना 2014 नंतर आजपर्यंत एकही समन्स बजावला नाही, तु भाजपची प्रवक्ता झालीस का गं ? तू अशी दुटप्पी का वागते सांगतेस का?, असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.