मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक यशस्वी बँकर असण्यासोबतच गायनामध्ये देखील त्यांनी आपली आवड कायम ठेवली आहे. मात्र अनेकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीसांना ट्रोल देखील केले जाते.
आपल्या ट्विटमधून राजकीय भाष्य केल्यामुळे, तसेच त्यांच्या गाण्यामुळे अमृता फडणवीस यांना ट्विटरवर ट्रोल केले जाते. या टीकांवर अमृता फडणवीसांनी आता मौन सोडले आहे.
जेव्हा एका स्त्रीचे विचार असतात. ते कधी कोणाला खटकू शकतात, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, जेव्हा एका स्त्रीचे विचार असतात. ते कधी कोणालाही खटकू शकतात. तेव्हा लोकं ट्रोल करतात. त्यामुळे काही पक्षांना ते खटकले असतील तर त्यांनी मिळून मला ट्रोल केलं असेल.
मी ट्रोल करण्याला काहीही मानत नाही. जसा माझा हक्क आहे ट्विट करण्याचा तसाच त्यांचा ही ट्रॉल करण्याचा हक्क आहे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, काही दिवसांपुर्वी भाऊबीजेच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचे तिला जगू द्या हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्यावरून देखील त्यांना ट्रोल करण्यात आले होते. युट्यूबवर या गाण्यावर डिसलाईकचा पाऊसच पडला होता.