मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात भाजपनंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील उडी घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करत या प्रकरणाबाबत चौकशी केली होती. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, असे अनिल देशमुखांना सांगितले. आता यावर अनिल देशमुख यांनी आपली भूमिका मांडली आहे.
अर्णब गोस्वामींच्या कुटुंबाला जेलमध्ये त्यांची भेट घेता येणार नाही. यामुळे अनिल देशमुख यांनी कोरोना व्हायरस महामारीचे कारण दिले आहे. देशमुख म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोन आला होता. पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटू द्या, असं त्यांनी सांगितलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व जेलमध्ये कोणत्याही कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी माहिती दिली की, मागील 4 महिन्यांपासून कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई आहे. कारण संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे अर्णव यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते जेल प्रशासनाकडून परवानगी घेऊन फोनवर अर्णब यांच्याशी बोलू शकतात.
अर्णब यांना मारहाण झाली का ? या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, अर्णब गोस्वामी प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
दरम्यान, आज राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.