मुंबई : कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना आता लस दिली जात आहे. मात्र असे असले तरी लसींअभावी लसीकरण केंद्र बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. लसीकरणाच्या पहिल्यात टप्प्यात कोरोना योद्धांना लस देण्यात आली होती. आता पत्रकारांपाठोपाठ एसटी कर्मचाऱ्यांना देखील प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनादेखील कोविड योद्धे समजून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी विनंती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कामामध्ये एसटी कर्मचारी आत्तापर्यंत अग्रेसर राहिले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांना अनेकदा आपल्या कुटुंबापासून लांब जावे लागते, रहावे लागते. प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्यांचे लसीकरण महत्त्वाचे असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करणे आवश्यक केले आहे. या सगळ्याचा विचार करता, संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी विनंती परब यांनी मुख्यमंत्र्यांना केली.