अहमदनगर : महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाची तयारी सुरू आहे. मात्र काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकीच्या नावाखाली चक्क सरपंचपदासाठी लिलाव केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला आहे. हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
देशात लोकशाही यावी, या साठी 90 वर्षात लाखो लोकांनी जेलमध्ये जाऊन, भूमीगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची, असे त्यांचे स्वप्न होते. पण सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
देशात लोकशाही यावी, यासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान केले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले की काय, तसंच 70 वर्षात लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला, तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभीचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भिती देखील अण्णा हजारेंनी व्यक्त केली.