मुंबई – अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी हे अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत गेल्या काही दिवसांत अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. यातच पोलीस सुरक्षेला गुंगारा देत एका व्यक्तीने अर्णब गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या मोबाईलवरुन अर्णब गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.
काही वेळापूर्वीच पोलीस अर्णव गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस त्यांना घेऊन नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सुरक्षेच्या कारणास्वत पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षांकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहे . हा परिसर तुरुंग प्रशासनाच्या देखरेखीखाली असल्याने याठिकाणी बाहेरील कोणतीही व्यक्ती अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.
इंटिरियर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात 4 नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अर्णव आणि इतर आरोपींना अलिबाग येथील नगरपालिकेच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात अर्णव गोस्वामी यांनी उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात अनेकदा जामिन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.