मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि सुरु असलेली लॉकडाऊन चर्चा, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नसला, तरी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. तसचं विविध राजकीय पक्षांशी आणि तज्ञांशी येत्या दोन दिवसांत चर्चा करून राज्यात आणखीन कडक निर्बंध लावणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
दरम्यान, यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा सूर आवळला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनता, हातावरचे पोट असणारा गोरगरीब, कष्टकरी, बारा बलुतेदार, छोटे उद्योजक यांना जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रथम व्यवस्था उभी करावी मगच लॉकडाऊनचा विचार करावा. राज्यातला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही करोनाच्या संकटात सरकारच्या हातात हात गघालुं उभे राहू, पण सरकारने सामान्य जनतेचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा, असं स्पष्ट मत, मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी मांडलं.
तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारच्या फेसबुक लाईव्हमध्ये जनतेला प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र ती सपशेल फोल ठरली. गेल्या वर्षभरात आघाडी सरकारच्या दिशाहीन धोरणांमुळे अनेक कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. आता परत लॉकडाऊन झाले तर अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतील असं त्यांनी म्हटलं आहे.
लॉकडाउन करावं लागेल असं काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयासोबत आम्ही एक विरोधी पक्ष म्हणून राहू. पण त्यासाठी सरकारने ज्यांचं हातावर पोट आहे त्यांची तसेच कष्टकरी, बारा बलुतेदार यांची व्यवस्था करायला हवी. – @keshavupadhye pic.twitter.com/hL4HB1p96O
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 3, 2021
यावेळेस त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना, गेल्या वर्षी राज्यात लॉकडाऊन घोषित करताच भाजपचे सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांना सर्व प्रकारची मदत केली आहे. आताही भाजपचा कार्यकर्ता राज्याचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. पण राज्य सरकारने निस्वार्थीपणाने जनतेची काळजी करावी, कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, लसीकरणाची मोहिम गंभीरतेने राबवावी, सर्वसामान्य व्यक्तींना ओषधोपचार मिळतील याकडे लक्ष द्यावे व ज्यांना ओषधोपचार परवडणार नाहीत त्यांना मोफत उपचार द्यावेत असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.