मुंबई : भारतातील प्रमुख लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी आपल्याला देशातील काही बड्या राजकीय नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. पुनावाला यांच्या खुलाशानंतर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपच्या आरोपानंतर प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली आहे.
अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, असे म्हणत अरविंद सावंत यांनी शिवसेनेवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पूनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम कसं करणार? शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला जात आहे. शिवसेनेनं धमकी दिलेली नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई झाली आहे, असा सणसणीत टोला देखील सांवत यांनी लगावला.
अरविंद सावंत म्हणाले की, पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला धडा शिकवला. जो महाराष्ट्राने आधीच दिला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असा टोला लगावतानाच बंगालमधील पराभवानंतर केंद्रातील भाजप नेते राजीनामा देणार का ? असा सवाल देखील त्यांनी केला.