हैद्राबाद : देशात महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि इतर औषधे, तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत असून, अनेकांचा अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच वाढत्या महामारीच्या संक्रमणामुळे मृत्यूदरातही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली असून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडत आहे. यातच एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत. मोदींनी रुग्णालायांतीत सुविधा का वाढविल्या नाहीत? केंद्र सरकार तेव्हापासून झोपले होते का? देशाच्या राजधानीत ऑक्सिजन का कमी पडतोय? आपण आत्मनिर्भर भारत आहोत, तर सौदी अरेबिया, रशिया आणि इतर देशांची मदत का घेत आहोत, असे काही थेट सवाल त्यांनी केंद्राला विचारले आहेत.
तसेच, ‘मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत. आणि यांना रक्ताची खुशबू येत आहे. मोदी सरकार अदृश्य झाले आहे. आमच्याकडे पीएम फंड असता, तर आम्हाला लोकांना ऑक्सिजन अथवा औषधी देता आली असती. त्यामुळे मोदी सरकारने पीएम केअर्स फंडातील पैसे काढून राज्य सरकारांना द्यायला हवेत. अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशात महामारीशी लढण्यासाठी उपयुक्त असलेल्या लशींच्या तुटवड्यावर बोलताना, देशात जर लसींचा तुटवडा होता, तर यापूर्वीच फायझर कंपनीला भारतात लस वितरीत करण्याची परवानगी का देण्यात आली नही, असा देखील सवाल ओवेसींनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मी, माध्यमांवर शरसंधान साधताना, ”मोदींच्या माध्यम चमचांनो, जागे व्हा. आपले स्वतःचेच लोक मरत आहेत. आता तरी मोदींचा बाजा वाजविणे थांबवा.असा इशारा दिला आहे.