मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवलं? असा थेट सवाल भाजपा नेते आणि माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला केला आहे.
नीती आयोग आणि खुद्द महापालिकेनं अलीकडेच महापालिकेच्या तीन प्रभागांमध्ये अँटीबॉडी टेस्ट केल्यानुसार, झोपडपट्टीतील 57 टक्के तर, इमारतींमधील 16 टक्के रहिवाशांना करोना होऊन गेल्याचं समोर आलं आहे. तर थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोपरला 36.7 टक्के, सांताक्रुजला 31.45 टक्के तर बांद्रा पश्चिमेला 17 टक्के जणांना कोरोना इन्फेक्शन होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. याचा सरळ अर्थ असा आहे की, सुमारे 40 टक्के मुंबईकरांना करोना होऊन गेला आहे. त्यांनी स्वबळावर त्यावर मात केली आहे. मग राज्य सरकार आणि महापालिकेनं केलं काय,’ असा सवाल शेलार यांनी केला आहे.
‘मुंबई महापालिका व राज्य सरकारने केलेले दावे साफ खोटे आहेत. झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांचं निर्जंतुकीकरण केलं नाही. तसेच इमारतींचं सॅनिटायझेशन केलं नाही. लोकप्रतिनिधी निर्जंतुकीकरण करीत असताना पालिकेने सांगितले की, पालिकेशिवाय अन्य कोणी निर्जंतुकीकरणाची फवारणी करु नये. त्यानंतर अग्निशमन दला मार्फत केवळ एकदा फवारणी केली. त्यानंतर याकडे लक्ष दिले नाही. एप्रिल, मे, जून या कालावधीत चाचण्या अधिक होण्याची गरज होती,त्यावेळी चाचण्यांची संख्या वाढवली नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होतच राहीला ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होती, किंवा जे मुंबईकर त्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत होते, त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली नाहीत. त्यांनी स्वबळावर कोरोनावर मात केली.