बीड : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून, राज्य सरकारने दिलेलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. त्यामुळे हा मराठा समाजासोबतच राज्य सरकारसाठी खूप मोठा धक्का आहे.
दरम्यान, यावर मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, राज्यातल्या अनेक नेत्यांनी देखील आपली मतं व्यक्त केली आहेत. यातच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी दिलेले बलिदान व्यर्थ ठरले आहे. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची होती. मात्र त्यांनी याबाबत गांभीर्य़ाने लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.