मुंबई : महाराष्ट्रात करोना संक्रमणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर राज्यात इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला आहे. तसेच, राज्यात करोना लसींचा देखील तुटवडा जाणवू लागल्याने, भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक लसीकरण केंद्रांमधील लसीकरण थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, एकीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असली. तरी दुसरीकडे मात्र राज्यातील या परिस्थितीवरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.
भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लसीकरण सुरु झाल्यापासून लसी नेमक्या कोणाकोणाला देण्यात आल्या, याचा हिशोब राज्य सरकारने मांडावा अशी मागणी केली आहे. त्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर, लसींच्या काळाबाजाराचा थेट आरोप केला आहे.
लसींच्या तुटवड्याचा दावा टिकताना दिसत नाही. प्रत्येक जिल्ह्यात किती लसी उपलब्ध आहेत याची माहितीच उघड झाली आहे. ठाकरे सरकार, आरोग्यमंत्री टोपे खोटं बोलतायत हे आता स्पष्ट झालंय. अभद्र राजकारणाचा पर्दाफाश झाला आहे. pic.twitter.com/b2puw9R7DK
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 10, 2021
त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर पाठवला असून, त्यात राज्य कुटुंब कल्याण खात्याच्या, आरोग्य विभागाच्या ६ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पत्राचा दाखला देत, राज्यात लसींचा साठा उपलब्ध असून, हा साठा लसींच्या दुसऱ्या डोसकरता राज्य सरकारने दडपून ठेवल्याचे म्हटले आहे. तसेच, याचे उत्तर आरोग्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
राज्यात लसींचा साठा करून त्यांचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे राज्यातल्या जनतेला काल लसीकरणापासून वंचित रहावे लागले. या सगळ्या प्रकरणामुळे केंद्र सरकारची देखील बदनामी झाली असून, राज्यातील जनता आणि केंद्र सरकारची आरोग्यमंत्र्यांनी माफी मागावी असे सांगत, या प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.