अहमदनगर: अधिवेशनदरम्यान भाजपचे १२ आमदार निलंबित करुन चर्चेत आलेल्या भास्कर जाधवांची गाडी गेली अनेक दिवसापासून सुस्साट होती. त्यांच्या गाडीला आता काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी ब्रेक लावला आहे. शिवसेनेकडे विधानसभेचं अध्यक्षपद हवं आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी मंत्रिपदाचा देखील बळी देऊ नये, अशी चतूर भूमिका भास्कर जाधवांनी मांडली होती. तसंच मी विधानसभेचं अध्यक्ष व्हावं, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे, असा दावा त्यांनी केला. त्यावर राजकारण कोळून प्यायलेल्या बाळासाहेब थोरातांनी एकाच वाक्यात जाधवांच्या सुस्साट गाडीला ब्रेक लावला. ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव आहेत’, असं म्हणत त्यांनी जाधवांच्या अध्यक्षपदाची शक्यता उडवून लावली.
“महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी उत्तम कामगिरी बजावली. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधित कोणताही विचार नाही किंवा चर्चाही नाही. आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत”, असं मत व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.
सत्तावाटपात काँग्रेसकडे अध्यक्षपद
“आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. शिवाय सत्ता वाटपात विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आलेलं आहे. आता याच्यामध्ये बदल करण्यासंबंधी आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली नाही. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही… यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे… कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे”, असंही थोरात म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते भास्कर जाधव?
शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद होईल. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्याचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे. विधानसभा अध्यक्षपद भास्कर जाधवांना दिलं तर जबाबदारीने ते सांभाळू शकतील, अशी नेत्यांमध्ये चर्चा आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता.