जळगाव – मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील महाविकासआघाडी तसेच अनेक विरोधी पक्ष सहभागी असून या भारत बंदचे पडसाद सर्वत्र देशभरात दिसत आहेत. या भारत बंद बाबत मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांकडून होणारे शरद पवार यांचे आरोपही खोडून काढले आहेत
केंद्राच्या नव्या कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी पेटून उठले आहेत. आज याचा उद्रेक होत भारत बंदंची हाक देण्यात आली. पण शेतकऱ्यांचं हे आंदोलन राजकीय आंदोलन नाही. सर्व मार्केट कमिटींनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारला असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
विरोधक हे पवार साहेबांच्या पत्राचा उल्लेख करतात. पण पवार साहेबांनी पत्राद्वारे काही सूचना केल्या होत्या. एपीएमसी यात काही सुधारणा करता येईल असं साधं पत्र लिहून त्यांनी सूचना केल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत हे सगळं खरेदी केलं पाहिजे. दंडुका घेऊन काय बदल करावा अस पवार साहेबांनी सांगितलं नव्हतं. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार केंद्राने घेतले राज्य सरकारने याबरोबर काही संबंध राहणार नाही. व्यापारी दलाल यावर कोणाचा नियंत्रण राहणार नाही. हमी भाव शेतकऱ्यावा मिळाला पाहिजे असंही यावेळी भुजबळांनी म्हटलं.
इतकंच नाही तर कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम असा आहे असंही भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळत आहे. त्याला शंभर टक्के केंद्र सरकार जबाबदार आहे अशी टीका भुजबळांनी केली आहे.