मूबई: भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात आज भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं जात आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारचा पुतळा जाळण्यात आला. नागपुरातील बडकस चौकात हे आंदोलन झालं.
अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. मात्र भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.
ओबीसी आरक्षणाच्या प्रस्तावावेळी गदारोळ करणाऱ्या आणि असंसदीय वागणूक करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन भास्कर जाधव यांनी केलं. महाविकास आघाडीचे १२ आमदार राज्यपालांनी रोखून धरले, त्याचा बदला जाधवांनी १२ आमदार निलंबित करुन घेतला, अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं वागणं तालीबानी वागणं, असल्याचा हल्लाबोल केला. अशा प्रकारे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात…
महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि १२ आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या १२ आमंदारांना परत घेत नाहीत तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.