राजस्थानमधील घोडेबाजाराच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ५०० कोटी रुपयांचा निधी गोळा करून दिला, या काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी भाजपवर हा आरोप केला होता. काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रुपये जमवले आहेत, असे सावंत यांनी म्हटले होते.
या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत सचिन सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांचा आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि तथ्यहीन आरोप आहे. असा आरोप करणाऱ्यांना सांगणं आहे की, आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर केली.
काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळात जी वक्तव्ये होत आहेत ती कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकार तथा महाविकासआघाडी सरकारला आलेले अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. कधी भाजप सरकार पाडतंय, कधी राजस्थानला मदत करतोय अशा प्रकारची निराधार वक्तव्य करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये लागल्याचे शंका येत असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.