मुंबई : देशात बुधवारी आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक ३. १४ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. जगात कुठल्याही देशात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामुळे देशात करोना बाधितांची संख्या वाढून १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ एवढी झाली आहे. दरम्यान दिवसभरात २१०४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींचा आकडा वाढून १ लाख ८४ हजार ६५७ एवढा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर देशात अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णसंख्येयमुळे, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन, तसेच करोना महामारीशी संबंधित इतर यंत्रणा आणि संबंधित लोक यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण आला आहे. करोना लसीकरणावर भर दिला जात असला, तरी लसींचा तुटवडा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, देशातल्या या परिस्थितीवरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादावर, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून, ‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार होते, अशी टीका करण्यात आली होती. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित केले आहेत.
केंद्र मदत करत आहे पण ◾️मुख्यमंत्री कितीवेळा दिलासा द्यायला बाहेर पडले?
◾️कोरोना लढाईत कोणती ठोस पावलेउचलली?
◾️बेड,ॲाक्सिजन, रेमडेसीव्हर यासाठीकाय नियोजन वर्षभर केले ?
◾️काय मदत गोरगरीबांना दिली?
◾️वर्षभरातील बदल्यापहा त्याऐवजी आरोग्याकडे लक्ष दिले असते तरदुरावस्था झाली नसती.— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 22, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या वर्षभराचे धोरण आहे. करोनाचा हाहाःकार सुरू असताना महाराष्ट्रातील जनतेला तुमचं तुम्ही पहा, तुमचा आजार तुम्हीच निस्तरा असच तर मुख्यमंत्री सांगत आहेत, असा पलटवार उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
तसेच, केंद्र सरकार मदत करत आहे, पण मुख्यमंत्री कितीवेळा दिलासा द्यायला बाहेर पडले? करोना लढाईत कोणती ठोस पावले उचलली? बेड, ॲाक्सिजन, रेमडेसीव्हर यासाठी काय नियोजन वर्षभर केले? काय मदत गोरगरीबांना दिली? अशी प्रश्नांची सरबत्ती दुसऱ्या एका ट्विटमधून करत त्यांनी, वर्षभरातील बदल्या पहा, त्याऐवजी आरोग्याकडे लक्ष दिले असते, तर दुरावस्था झाली नसती, अशी खोचक टीका यावेळी ठाकरे सरकारवर केली.