मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता भाजपकडून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली जात आहे.
आजकाल बालनाट्य बंद, पण थिएटरमध्ये बंद झालेली बालनाट्ये ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरू असल्याची बोचरी टीका आशिष शेलार यांनी नाव न घेता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
बाल रंगभूमीवर बालनाट्य बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात "होय! मेट्रोचा खेळ खंडोबा करुन दाखवला!!" नावाचे सुरु असलेले बालनाट्य मुंबईकर हताशपणे पाहत आहेत.! pic.twitter.com/c8Qa1dZDAe
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 16, 2020
आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला चपराक लावली आहे ते अपेक्षितच होते. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की मिठागर आयुक्तांची एनओसी आपण घेतलेली नाही. ही जागेवरील खासगी मालकांचे त्याबाबतचे दावे तुम्ही विचारात घेतलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हे राजकीय दबावापोटी आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राजकीय दबावापोटी घेतलेले हे आदेश मागे घेण्याची नामुष्की या सरकारवर आलेली आहे, आणि न्यायालयाने आता जैसे थे ते आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विलंब होऊन प्रकल्पाची किंमत वाढणार आहे. ही किंमत वाढल्यामुळे मुंबईकरांवर तिकीटाचा बोजा वाढणार आहे. जकाल बालनाट्य बंद, पण थिएटरमध्ये बंद झालेली बालनाट्ये ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरू असल्याचे म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.