पुणे – मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. सहसा शरद पवार खालच्या लेव्हलची स्टेटमेंट्स करत नाहीत. पण ते असं का करत आहेत, ते माहिती नाही, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
महाविकास आघाडीचा अजेंडा एक नाही आणि झेंडाही एक नाही आहे. एकमात्र अजेंडा आहे की भाजपला निवडणुकीत वेगळं ठेवणं आहे. एव्हढी भीती त्यांच्या मनात भाजपबद्दल आहे. ते एकत्र आले त्यामुळे आलेले निकाल अनपेक्षित नाहीत. मी त्यांना अनेकदा आव्हान दिलंय की त्यांनी एकट्यानं लढावं, पण ते घाबरतात. ते एकत्र लढतात. तरी देखील आम्ही या पराभवाचं चिंतन करु, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकाल समोर आले आहेत. निकालास आश्चर्यकारक असं काहीही नाही. तिघे एकत्र येऊन लढले. त्यामुळे असं चित्र समोर आलं. तरी देखील भाजपनं निकरानं लढा दिला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, या निवडणुकीच्या निकालांना महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराचा कौल म्हणता येणार नाही. प्रत्येक पक्षाची एक व्होट बॅंक असते. यामुळे राज्यातील सरकारवर लोकं खूश आहेत, असं म्हणता येणार नाही. मित्राचा मित्र राहायचं नसेल तर मग दु:ख करण्यात काही अर्थ नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.