मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरु झालेलं वाकयुद्ध सध्या तरी लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांतदादांनी अजित पवारांना झोप कमी करा आणि पालकमंत्रीपद सोडा असा सल्ला दिला होता. त्यावर आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासा, अशी टीका अजितदादांनी केली.
तसेच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला येऊन भेटले, किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा टोला लगावत, टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करु नये, असा इशारा देखील त्यांनी दिला.
याला चंद्रकांत पाटलांनी, आज पुण्यात मीडियाशी संवाद साधताना, दादांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही. ते सक्षम आहेत. ते सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. बाकीच्या मंत्र्यांचा दिवस 11 वाजता सुरू होतो. मात्र अजितदादांवर कामाचा लोड आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा. त्यांनी पुण्यातून राज्य चालवल्यास, ते लोकांना सहज उपलब्ध होतील आणि लोकांच्या समस्या वेगाने आणि लवकर सुटतील, असं उत्तर देत पुन्हा डिवचलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना, राज्य सरकारने त्यांचं अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. सरकार म्हणून तुम्ही काय देत आहात हे सांगा, असा सवाल केला.