मुंबई : जनतेला भ्रमित करणं अन् महिलांची मानहानी करणं हेच ठाकरे सरकारचं लक्ष्य आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्यांना मार्च २०२०मध्ये पदावरून हटविण्यात आल्याच्या संदर्भात विश्वास पाठक यांनी सरकारवर आरोप करत निशाणा साधला आहे.
राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेले राज्य सरकार राज्य महिला आयोगावरील नियुक्त्या करण्याची तत्परता दाखवत नाही. महिला आयोगाच्या सदस्यांना पदावरून हटवून त्यांचे फोटो मात्र संकेतस्थळावर तसेच ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ जनतेला भ्रमित करणं अन् महिलांची मानहानी करणं हेच ठाकरे सरकारचं लक्ष्य आहे, अशी जोरदार टीका पाठक यांनी केली.
फडणवीस सरकारने नियुक्त केलेल्या सहा सदस्यांना महाआघाडी सरकारने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच हटविले असल्याचा आरोप देखील पाठक यांनी केले आहे.
या सदस्यांची नावे, फोटो अजूनही आयोगाच्या संकेतस्थळावर असून, या सदस्यांनी मार्च ते सप्टेंबर २०२० या काळात मिळालेला भत्ता तातडीने आयोगाच्या बँक खात्यात भरावा, असे पत्र पाठविण्यात आल्याचे, पाठक यांनी म्हटले आहे.