मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून अजूनही राज्यात सत्ताधारी आणि विरोधाकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सुशांतची हत्या नसून, आत्महत्या असल्याचे एम्सच्या अहवालात म्हटले आहे. यावरून आता सत्ताधारी पक्षाने पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे.
आता या प्रकरणात भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. ‘सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडे ६५ दिवस होता. या कालावधीत ड्रग्स संदर्भातील गंभीर व्हॉट्सअॅप चॅट उपलब्ध असताना देखील असे कोणते कारण होते की महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले? एवढी महत्त्वाची गोष्ट सरकारने दडवून का ठेवली?,’ असा सवाल राम कदम यांनी पत्रातून केला आहे.
#सुशांतसिंगराजपूतच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारकडे या प्रकरणाचा तपास 65दिवस होता या कालखंडामध्ये ड्रगच्या संदर्भातील गंभीर व्हटस अप चाट उपलब्ध असताना देखील असे कोणते कारण होते की महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले ?एवढी महत्त्वाची गोष्ट @CMOMaharashtra दडवून का ठेवली ? pic.twitter.com/zChVLkOBWe
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 4, 2020
या प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही, अशी देशातील कोट्यवधी जनतेची मानसिकता आहे. म्हणूनच 56 दिवसांमध्ये कोणाची अटक नाही किंबहुना ड्रग्सचा विषय समोर आला नाही हा दाबण्याचा प्रयत्न का केला? , असा सवाल त्यांनी विचारला आहे.
56 दिवसांनी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेल्यानंतर ड्रग्स प्रकरणात 19 पेक्षा अधिक जणांना तुरुंगात जावं लागले. रिया चक्रवर्तीचे प्रवक्ता म्हणून सरकारचे नेते आणि सरकार वागत होते तिलाही तुरुंगात जावं लागतं हे सर्व देशाने पाहिलं असा टोला राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.