प्रतिनिधी, नकुल नाडकर्णी – गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभाग्रुहात वर्षभराच्या कालावधीनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपा खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये जोरदार वादंग झाल्याचे पाहायला मिळाले. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्पाच्या कालव्याच्या निक्रुष्ट कामाच्या ठेकेदारीवरून हे वाद झाले.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा नियोजन समितीची सभा झाली होती. कोरोना साथीमुळे गेल्या काही महिन्यात सभा होऊ शकली नाही. तरीदेखील जिल्हा परिषदेच्या सभा सुरु झाल्या होत्या, पालकमंत्र्यांचे जनता दरबार सुरु झाले होते. असे असताना नियोजन समितीची सभा का नाही?असा सवाल भाजपाच्या नेत्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभुमिवर गुरुवारी या वर्षातील पहिली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली.
पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे,जि.प.अध्यक्षा समिधा नाईक उपस्थित होते. तीन तास चाललेल्या या सभेत अनेकवेळा खेळीमेळीत विषय पुढे ढकलले मात्र अनेकवेळा शाब्दिक खडाजंगीच पहायला मिळाली.
काही दिवसांपुर्वी तिलारी कालवा फुटण्याची घटना घडली होती त्याचे पडसाद या सभेत उमटले. या तिलारी कालव्यांसाठी केंद्र सरकारकडुन 45 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तिलारी कालव्याचे काम निक्रुष्ट झाले असुन संबंधीत ठेकेदारवर कारवाई करावी अशी मागणी त्या भागातील भाजपाच्या नेतेमंडळींनी केली होती. ही मागणी मान्य करत खा. विनायक राऊत यांनी ठेकेदारावर कारवाई व्हायलाच हवी अशी भुमिका मांडली. त्यानंतर शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी हे नियोजन समितीचे निमंत्रक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ते या सभेला उपस्थित होते. तिलारी कालव्याच्या मुद्यावरून बोलताना त्यांनी विरोधकांकडे बोट दाखवत हेच ठेकेदार आहेत असे उदगार काढले.
शिवाय तिलारी कालव्याच्या कामावर चर्चा करायची म्हटली तर एक दिवसही पुरणार नाही असा टोलाही लगावला. त्यामुळे भाजपचे सदस्य आक्रमक झाले. यावेळी बाबुराव धुरी यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्यास सुरूवात केली. त्यावेळी खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी धुरी यांना खाली बसायला सांगितले.
याचवेळी खा.विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि ते म्हणाले “आम्ही खा.राणे यांचा आदर करतो, परंतु आमदार नितेश राणे यांनी सदस्यांना खाली बसण्यास सांगणे हे चालणार नाही .खा.राऊत यांच्या पवित्र्यानंतर शाब्दीक खडाजंगी वाढली. यामुळे राणे आणि विनायक राऊत यांच्या मोठे वाद झाले. सभागृहात सदस्य मोठ्यामोठ्याने बोलु लागले. यावेळी खा.राऊत यांनी धुरी यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही हे पुन्हा पुन्हा सांगण्यास सुरूवात केली. यावेळी राणे यांनी ठेकेदारांची नावे तुम्हाला हवी आहेत का ?असा सवाल उपस्थित केला. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी तुम्ही आपापसात भांडु नका,मी नियोजन समितीचा अध्यक्ष आहे, मी यामध्ये सुवर्णमध्य काढतो असे सांगुन हा वाद थांबवला. तसेच तिलारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून याची चौकशी करु असे आश्वासनही दिले.
या तिलारी कालव्याच्या वादावरून पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना यांच्यात वाद झाले. राणे आणि शिवसेना यांच्यात जुने वाद असून काहीना कारणावरून राणे कुटुंब शिवसेनेला वेठीस धरत असते. त्यामुळे राणे आणि शिवसेना हे प्रकरण पून्हा एकदा पेटणार का? तिलारी कालव्याच्या मुद्यावरून खासदार विनायक राऊत आणि राणे यांच्या झालेल्या वादामुळे येत्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होणार ? तसेच पालकमंत्री उदय सामंत यावर काय सुवर्णमध्य काढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.