राष्ट्रवादीने भाजपाला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे व त्यानंतर आम्हाला सल्ला द्यावा, असे म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असे काहींना वाटते, असे म्हटले होत s.
पवारांच्या या टीकेवरून भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील या मुद्यावरून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे कित्येक आमदार आणि मंत्री दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन थांबवावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. त्यानंतर आम्हाला सल्ले द्यावा. राम मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपाला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे.