मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन, राज्य सरकारने रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी हे धोरण अवलंबत, कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत.
राज्यात यापुढे ‘ब्रेक दी चेन’ या नावाने ही नवी नियमावली लागू होईल. या नियमावली अंतर्गत राज्यात, १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी असेल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. तसेच शनिवार-रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. या अनुषंगाने सोमवार (५ एप्रिल) रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत, या नवीन करोना प्रतिबंधक नियमांची अंमलबाजवणी केली जाणार आहे.
दुसरीकडे राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्व प्रादेशिक विरोधी पक्षांनी, संघटनांनी, सहकार्याच्या भूमिकेतून पाठींबा दिला आहे, मात्र प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने, निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, हे प्रश्न त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पाठवले असून, ‘जनहितासाठी पाठिंबा; पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या, असं त्यांनी म्हटलं आहे.
◾️रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का?
◾️पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही याची हमी सरकार देईल का?— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 5, 2021
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपाचा पाठिंबा असून जनतेने देखील पाठिंबा द्यावा, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे. आम्ही जनतेला आव्हान करतो, या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं, भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो, त्यांनी नियमांचे पालन करावं.
तसेच त्यांनी यावेळी सांगितले आहे की, सरकारने केवळ लॉकडाऊन किंवा निर्बंधाची चर्चा करुन चालणार नाही. त्यासोबतच नवीन स्ट्रेन काय आहे? तो इतक्या वेगाने महाराष्ट्रातच काय वाढतोय? या संदर्भात प्रबोधन केलं पाहिजे. नव्या स्ट्रेनमुळे फुफ्फुस्यांवर मोठ्या प्रामाणात प्रभाव पडतो. नव्या स्ट्रेनबाबत सरकारकडून प्रबोधन व्हावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.