नवीदिल्ली : “राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कारखान्यांचे अकाऊंट एनपीएमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत हे कारखाने सुरु करण्यासाठी बँका पैसे उपलब्ध करुन देण्यास तयार नाहीत. ऊसाचं पीक यावर्षी मोठ्या प्रमाणात आलं आहे. पुढच्या काळात शेतकरी अडचणीत येऊ नये. त्याचा संपूर्ण ऊस गाळला जावा यासाठी बँकांशी काय चर्चा करता येईल ? राज्य सरकारने काय केलं पाहिजे ? केंद्र सरकारच्या नेत्यांना भेटून काही करता येईल का ? या विषयावर माझी आणि पवारांची चर्चा झाल्याचे रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहीवर बोलताना सांगितले.
भाजपा नेते रावसाहेब दानवे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून रावसाहेब दानवे यांनी मात्र यामागे कोणतंही राजकीय कारण नव्हतं असं सांगितलं आहे. साखर आणि कांदा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली असं त्यांनी सांगितलं असून संजय राऊत यांच्यासोबत करोनावर चर्चा झाल्याचा खुलासा केला.
“याशिवाय कांदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष आम्ही पाहिला. त्यांना न्याय दिला पाहिजे. कांदा निर्यात बंद असल्याने भाव पडतील शेतकरी सांगत आहेत. त्यासाठी काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं पाहिजे अशी चर्चा झाली,” असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. मोदींची वेळ मागितली असून त्यानंतर भेटीचं स्वरुप ठरवलं जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
साखर कारखान्यांच्या अडचणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर आज शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत चर्चा झाली. दोघांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मंगळवार नंतर या विषयासंदर्भात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांची भेट घेणार आहे.@PawarSpeaks pic.twitter.com/EqESU3vtDH
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) September 17, 2020
संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना रावसाहेब दानवेंनी म्हटलं की, “दारात उभं राहिल्यावर दिसतो एवढी आमची घऱं जवळ आहेत. यावेळी आपण चहा घ्यायला या असं बोलत असतो. करोना सोडून कोणत्याही विषयावर आमच्यात चर्चा झाली नाही” असे देखील दानवे यांनी सांगितले.