मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असून, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मदत करावी, अशी भूमिका घेतली होती. याला भाजपकडून प्रतिसाद दिला गेला असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना उत्तर दिले आहे.
“अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते आता वेड पांघरून पेडगावला जात आहेत. आता केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. मात्र, इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, राज्यातलं आघाडी सरकार वारंवार महत्वाच्या विषयांवर आपली जबाबदारी झटकत आहे. हेच पुन्हा या निमित्ताने दिसून आले आहे. परंतु, मराठा समाज हे सहन करणार नाही. घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतरही, एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचा राज्य सरकारचा अधिकार आणि जबाबदारी कायम आहे. त्यानुसार आघाडी सरकारने जबाबदारी पार पाडावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.