सांगली : राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि व्यवस्था मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मात्र, राज्यपाल हे स्वतंत्र विचारांचे आहेत. ते लवकरच विधानपरिषदेसाठी राज्य मंत्रिमंडळाने सुचविलेल्या नावांना मान्यता देतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
ते गुरुवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांना विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकर निर्णय घेणे अभिप्रेत असल्याचे सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने सुचविलेली 12 नावे योग्य आहेत. त्यामुळे राज्यपालांनी 15 दिवसांत याबाबतचा निर्णय घ्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले. राज्याच्या मंत्रिमंडळाने केलेल्या सूचना राज्यपाल डावलत नाही, अशी प्रथा आपल्याकडे आहे. मात्र, पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्था आणि प्रथा मोडण्यात भाजपचा हातखंडा आहे. परंतु, राज्यपाल हे स्वतंत्र विचारांचे असल्याने ते लवकरच मंत्रिमंडळाने सुचविलेल्या नावांना मान्यता देतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
‘प्रतिस्पर्धी पक्षाच्या आमदारांना भाजप जाणीवपूर्वक अडचणीत आणतेय, हे जनतेला समजलंय’
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’कडून करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात जयंत पाटील यांनी भाष्य केले. त्यांनी प्रताप सरनाईक यांचे समर्थन केले. प्रतिस्पर्धी पक्षाच्या आमदारांना भाजप जाणीवपूर्वक अडचणीत आणतेय, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
प्रताप सरनाईक हे बांधकाम उद्योजक आहेत. ठाणे शहरात व्यवसाय करुन ते मोठे झाले. त्यांनी कोणताही राजकीय फायदा घेऊन काम केलेले दिसत नाही. तरीही प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाली. मात्र, सत्य लवकरच बाहेर येईल. ही कारवाई चुकीची असल्याचे लोकांच्या लक्षात येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Read Also :
शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप
पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय
‘पाच वर्ष आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाणाऱ्यांवर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ’