अहमदनगर : जामखेड पंचायत समिती सभापती पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे आणि भाजपच्या मनीषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्याचे निवडणूक अधिकारी नष्टे यांनी जाहीर केले. त्यानुसार इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या वैष्णवी रमेश जगदाळे या विद्यार्थिनीने बॉक्समधून चिठ्ठी काढली. वैष्णवीने काढलेल्या चिठ्ठीवर राजश्री मोरे यांचे नाव होते. त्यानंतर निवडणूक अधिकारी नष्टे यांनी राजश्री मोरे यांची निवड जाहीर केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात एकच जल्लोष केला.
जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी तीन जुलै रोजी प्रक्रिया झाली होती. मात्र उच्च न्यायालयाने मतमोजणी करण्यास स्थगिती दिली होती. सदर स्थगिती उठल्यानंतर गुरुवारी (15 ऑक्टोबर) पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 च्या सुमारास बैठक सुरू झाली. यावेळी मतमोजणी करण्यात आली.
जामखेड पंचायत समितीच्या सभापतींची निवड हा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. सभापतीपदासाठी उभे राहिलेल्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर चिठ्ठीद्वारे ही निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राजश्री मोरे यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे जामखेड पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती विराजमान झाल्या आहेत. यावेळी आमदार रोहित पवार यांनी नवनियुक्त सभापती राजश्री मोरे यांचा सत्कार केला.
Read Also
'त्या' प्रकरणातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश https://t.co/cXNJCJExqE#AjitPawar #NCP #MVA @AjitPawarSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 15, 2020