दिल्ली – नव्या कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १४ वा दिवस सुरु आहे. आंदोलन थांबवण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आतापर्यंत पाच वेळा बैठक पार पडली. पण आतापर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. यादरम्यान केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना नवा प्रस्ताव पाठवला आहे.
सरकारने लिखीत प्रस्ताव दिला असून त्याचं वाचन केल्यानतंरच आंदोलनासंबंधी पुढील निर्णय घेतला जाईल असं शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सरकारने पाठवलेल्या नव्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी पंजाबमधील ३२ शेतकरी संघटनांनी बैठक बोलावली आहे. उर्वरित आठ संघटना नंतर चर्चेत सहभागी होणार आहेत. शेतकरी यावेळी कायदे रद्द व्हावेत या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर आम्हाला तोच प्रस्ताव दिला जात असल्याचं सांगितलं होतं. या प्रस्तावात एपीएमसी अजून मजबूत करण्यासंबंधी तसंच वादांची स्थानिक कोर्टात सुनावणी, मुलभूत आधार किंमतासंबंधी उल्लेख असल्याची माहिती आहे.