मुंबई : १४ एप्रिलपासून राज्य सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता. आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते.
मात्र तरीही दिवसेंदिवस महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतच आहे, तर दुसरीकडे मृत्यूदर देखील उंचावत आहे. यातच राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून रेमेडीसीवर इंजेक्शन्स, बेड्स, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र आहेत.
त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती. त्यानुसार राज्य सरकारने आधी असलेल्या नियमांसोबतच आता अधिक नवीन नियम जारी केले आहेत आणि हे सर्व निर्बंध राज्यात १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्रातील जनतेशी काल संवाद साधला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या संवादातील काही मुद्द्यांवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सवाल केले आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, करोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. करोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
तसेच, “तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यातच करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती, तर गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते, तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती”, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
सोबतच “राज्यात लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढविल्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या रोजगाराचे नुकसान होणार आहे, ते ध्यानात घेता मुख्यमंत्री शुक्रवारी काही वाढीव पॅकेज जाहीर करतील, असं वाटलं होतं पण त्यांनी निराशा केली. आधीच्या पॅकेजच्या अंमलबजावणीची त्यांनी दिलेली माहितीसुद्धा समाधानकारक नाही,” अशी टीका देखील महाविकास आघाडीवर पाटील यांनी केली.