मुंबई : कृषी विधेयकाला देशभरात जोरदार विरोध होत आहे. काँग्रेसने देखील या विधेयकाला विरोध केला असून, राज्यात हे विधेयक लागू न करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असेही म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला शेतकऱ्यांचे नुकसान करायचं आहे. मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडली आहे काय?, अशी जोरदार टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विचार करून कृषी कायदे आणले आहेत. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूंच्या कायद्यांना विरोध करत आहे कारण त्यांना शेतकऱ्यांचं भलं करायचं नाही तर नुकसान करायचंय. मला प्रश्न पडलाय की मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडली आहे काय?
मध्यावधी निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, मध्यावधी निवडणुका कोणत्याच पक्षाला नको असतात. निवडणूक कार्यक्रमाची आखणी, उमेदवार देणे, प्रचारसभा लावणे हे लगोलग शक्य होणाऱ्या गोष्टी नसतात. पण अस्थिततेमधून सोल्युशन काय हे पण लक्षात येत नाही. निवडणुका न होण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतील, पण कोणाचेच कॉम्बिनेशन जमलं नाही तर मग पर्याय राहणार नाही.