कोल्हापूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे.
उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली
चंद्रकांत पाटील म्हणाले,”राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. पण मला जर विचारालं तर सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरतच नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सांगितलं असेल”, असा चिमटा पाटील यांनी काढला.