औरंगाबाद : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. चंद्रकांत पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जाण्याची वेळ आली आहे, असे सत्तार यांनी म्हटले.
अब्दुल सत्तार यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करु. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांतदादा यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
‘शरद पवार राहुल गांधींविषयी असं बोलले नसतील’
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याची टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून महाविकासआघाडीला इशारा दिला होता. हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी कराव, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते.
यावर अब्दुल सत्तार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे राहुल गांधींविषयी तसं बोलले नसतील. पण तिन्ही पक्षांनी समन्वय टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
‘देवेंद्र फडणवीसांनी दिवसा स्वप्नं पाहू नयेत’
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजपला राज्यात एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी असल्याचे वक्तव्य केले होते. यावर अब्दुल सत्तार यांनी त्यां टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा सत्तास्थापनेची स्वप्नं पाहू नयेत. त्यांचं स्वप्न खरं होणार आहे. पण ते 32 तारखेला, आणि 32 तारीख येणार असेल तर त्यांनी जरूर सरकार स्थापन करावं, अशी खोचक टिप्पणी अब्दुल सत्तार यांनी केली.
Read Also :
बॉक्सिंग महासंघ निवडणुकीच्या रिंगणात आशीष शेलार?
‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, मंत्री सतेज पाटलांचा टोला
नितीन गडकरींची तरतूद आणि श्रेयवादाच्या लढाईत कोल्हे, लांडगे, आढळराव पाटलांमध्ये चढाओढ
“लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक आहे का?”; निलेश राणे यांचा अजित पवारांवर हल्ला
येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा