मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. महाराष्ट्राला पण समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होतोय, याची उत्सुकता आहे. जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये कामात कुठे तरी अडचण येईल, खंड पडेल, असं वाटलं होतं. पण कोरोना काळातही काम मंदावलेलं नाही. येत्या 1 मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो. येत्या 1 मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ. त्याच्या पुढच्या 1 मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलं असू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे
समृद्धी महामार्ग 56 हजार कोटींचा प्रकल्प असून, या महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास 6 तासांवर येणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे 60 टक्के काम पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील फतियाबाद ते वैजापूर तालुक्यातील सुराळ्यापर्यंत 60 टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्या मे अखेरपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली होती.