औरंगाबाद : विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनेक वर्ष भाजपचे गड असलेल्या मतदारसंघात देखील भाजपचा पराभव झाला होता. यामागचे कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवणे हे असल्याचे सांगितले जाते. मात्र आता या मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसल्याची कबुली भाजप नेत्याने दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने निर्णय घेतला असला तरीही भाजपला पाठिंबा वाढण्यासाठी उपयोग झाला नाही. उलट आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशीच भावना मराठा समाजात आहे. त्याचा काहीसा फटका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बसला असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
भाजप हा मराठा केंद्रीत पक्ष झाला अशी प्रतिम निर्माण झाल्याचे देखील त्यांनी मान्य केले. तसेच, पदवीधर निवडणुकीच्या हद्दीपर्यंत ‘सोशल इंजिनिअरींग’ मध्ये काही चुका झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचविल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीत झालेल्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी बावनकुळे यांनी जालना आणि औरंगाबादमधील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पुढील निवडणुकांच्या वेळी दोन वर्ष आधीच उमेदवार निश्चित करावा, अशी शिफारस देखील असेल, असे त्यांनी सांगितले.