अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विधानसभा अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. राजस्थानचे कायदे आणि संसदीय कार्य मंत्री शांति कुमार धारीवाल यांनी आज विशेष अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान झाले. यामध्ये गेहलोत सरकारने बहुमत सिद्ध केल.
गांधी कुटुंबियांच्या मध्यस्थीनंतर अखेर मुख्यमंत्र्यांवर नाराज असलेले सचिन पायलट पुन्हा पक्षात परतले. त्यामुळे गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट टळले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी आपण चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकलो असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागला असल्याचेही म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. तसेच सचिन पायलट यांनी ट्विट करत राजस्थान ही आपली कर्मभूमी असल्याचे म्हटले आहे.