काही दिवसांपुर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट साखर कारखान्यांच्या समस्या संदर्भात होती, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र आता फडणवीस-शाह यांच्या भेटीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली आहे.
साखर कारखान्यांची समस्या घेऊन दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केली आहे.
मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामागे काय कारण असू शकते, असा प्रश्न केला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, साखर घरातच लागते ना. गृहात. त्यामुळे फडणवीस तिकडे गेले असावेत. त्यांना गृहखातं… गृहमंत्री हे आदेश बांदेकरांसारखे वाटले असावेत. बांदेकर कार्यक्रम करतात… होम मिनिस्टर… त्यांना वाटलं गृहमंत्रीही होम मिनिस्टर आहे… साखर घरात लागते… म्हणून गेले असतील त्यांच्याकडे साखरेचा प्रश्न घेऊन, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.