कोल्हापूर : मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे लातूरमध्ये एका उच्च शिक्षीत तरूणाने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे , अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
या परिषदेमध्ये 50 हून अधिक संघटना सहभागी होणार आहेत. कोरोनामुळे पुण्यात होणारी गोलमेज परिषद रद्द करावी लागली होती. मात्र आता शासनाचे सर्व नियम पाळून 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता रावजी मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाच्या लढाईचे रणाशिंग फुंकले जाणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.
1 ऑक्टोबर पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील आमदार व खासदार यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.