जळगाव : राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 30 डिसेंबरपर्यंत अनेक उमेदवारांनी अर्ज भरले, तर अर्ज छाननीमध्ये काही त्रुटींमुळे अर्ज बाद देखील झाले.
जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरलेला असाच एक अर्ज बाद केल्याने गोंधळ उडाला. जळगाव तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी अर्जावर हरकत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद ठरविल्याने तृतीयपंथीयांनी संताप व्यक्त करीत तहसील प्रशासनाला धारेवर धरले व गोंधळ घातला.
आपला अर्ज चुकीची हरकत घेऊन बाद केला आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा दावा अंजली पाटील यांनी केला. या निर्णयावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले.
2015ची ग्रामपंचायत निवडणूकदेखील लढवली होती. त्यावेळी आपण 1 मतांनी पराभूत झालो होतो, मात्र यावेळी अर्ज रद्द करण्यात आल्याचा, दावा अंजली यांनी केला आहे.