बंडाचा झेंडा हाती घेतलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाने कितीही षडयंत्र रचलं तरी राजस्थानमधील सरकार मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“कुटुंबात जर कोणी नाराज असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करुन त्यावर उपाय शोधला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यातर्फे मी सांगू इच्छितो की, सचिन पायलट आणि इतर कोणत्याही सदस्यांसाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत,” अस रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे
“राजस्थानमधील सरकार स्थिर असून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वास आहे. भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी कोणतंही षडयंत्र रचलं तरी यश मिळणार नाही,” असं रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी सांगितलं. रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांच्या घरावर छापे टाकण्यावरुनही भाजपावर टीका केली. आयटी, ईडी, सीबीआय भाजपाचे वकील असून असे छापे टाकून सरकार कोसळणार नाही असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.