कोरोनाच्या कठीण संकटात सरकारला मदत करण्याऐवजी अडचणी वाढवण्यात भाजपा नेत्यांना रस आहे. असा ‘महाराष्ट्र द्रोह’ करण्यापेक्षा मोदींकडे राज्यासाठी आर्थिक मदत मागा. भाजपाचे सरकार असताना दुध उत्पादक शेतकऱ्यांची काय दुरावस्था केली होती हे महाराष्ट्र जाणतो. भाजपाचा जाहीर निषेध!’, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप किती खालच्या पातळीवर उतरणार आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा असंतोष निर्माण करुन गलिच्छ राजकारण करणे हाच उद्देश आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.तसेच भाजपने दुध दरवाढीसाठी १ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली होती. पण पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दुधाच्या प्रश्नावर २१ जुलै रोजी बैठक बोलावल्यामुळे भाजप लगबगीने सोमवारी आंदोलन करत आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँकेत जमा करावं. दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रती किलो ५० रुपये अनुदान, गायीच्या दुधाला ३० रुपये दर द्यावा, अशी मागणी भाजपने केली होती यावर सावंतांनी भाजपला धारेवर धरले आहे.