मुंबई : बंगालची निवडणूक संपल्यानंतर राजकीय टीका, आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. याचं वारं महाराष्ट्रातून देखील वाहत असून, या विषयावर सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधत, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील विचलित झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोलाही वडेट्टीवारांनी पाटलांना लगावला आहे. तसेच, निवडणुकांचे नियोजन योग्य प्रकारे केलं असतं, तर महामारीचा प्रादुर्भाव वाढला नसता, असं देखील यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी भाजपवर टीका करताना, निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी भाजपवर केला. तसेच, सध्याच्या राज्यातल्या महामारीने बाधित रुग्ण आणि मृतांच्या आकडीवरून देखील त्यांनी, “महाराष्ट्रानं आकडे लपवले नाहीत. इतर राज्यांनी आकडे लपवले, असा आरोप केला. तसेच, लाखोंच्या संख्येनं रुग्ण मिळत असूनही केंद्र सरकार देशभरात लॉकडाऊन का घोषित करत नाही? असा सवाल देखील केंद्राला विचारला आहे.