नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
सरकार स्थापन करताना दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचे ठरविले होते. आता त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी मांडली आहे.
सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या थेट पत्रातून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत काही भूमिका मांडल्या आहेत.
काय आहे सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात?
अनुसूचित जाती /जमातींसाठी योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सोनिया गांधी यांनी पत्रात उल्लेख केला आहे. राज्यातील सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी कमी केला गेला आहे. त्यावरूनच सोनिया गांधी यांनी भूमिका घेत आदिवासी आणि दलित समाजासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही भूमिका मांडली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दलित आणि आदिवासी यांच्यासंदर्भातील योजनांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची होती. त्याचा संदर्भ देत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.