इंदापूर : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तीन पक्ष प्रमुख म्हणून ओळखले जातात. त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या एकाच नाण्याच्या दोन वेगळ्या बाजू आहेत, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हे दोन मित्रपक्ष संधी मिळताच एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नाना पटोलेंच्या सध्याच्या इंदापूर दौऱ्यात याच गोष्टीची पुन्हा प्रचिती आली.
काँग्रेसकडून, महाराष्ट्रातली काँग्रेसची प्रतिमा बदलण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी, काही महिन्यांपूर्वी काही फेरबदल करण्यात आले. यामध्ये आक्रमक असलेल्या नाना पटोलेंना महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीची जबाबदारी सोपवली गेली, ही धुरा ते यशस्वीतेने पार पाडत असले, तरी महाविकास आघाडी सरकारमधलं काँग्रेसचं स्थान काय? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात आहे. तसेच काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत देखील अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
दरम्यान, गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे इंदापूरात आले होते. ही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी नेहमी महत्वाची राहिली आहे. मात्र या दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, पुढील निवडणुकीत इंदापूरात काँग्रेसचाच आमदार असेल असे विधान केल्यामुळे, सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले आहेत.
तसेच, इंदापूर तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. गावागावात काँग्रेसला लोकं मानतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा आमदार काँग्रेसचा असेल. त्याचसोबत जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे. मात्र संधी साधूंसाठी जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे, सत्तेसाठी नाही, अशांना काँग्रेसचं दार उघडं आहे असे सांगत २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार आहे, असा दावा देखील नाना पटोलेंनी केला आहे. त्यांनी केलेल्या या विधानांमुळे, ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात असल्याच्या चर्चा देखील हातात उठू लागल्या आहेत.