भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई न करण्याच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून केली आहे. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी मार्क झुकरबर्ग यांना ईमेलद्वारे पत्र लिहून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
के. सी. वेणुगोप यांनी मार्क झुकरबर्ग यांच्याकडे फेसबुक इंडियाबाबत अनेक आक्षेप नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणाची फेसबुकच्या मुख्यालयाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच चौकशी होऊपर्यंत फेसबुक इंडियाची जबाबदारी आरोपी अधिकाऱ्यांकडून काढून नव्या टीमकडे देण्याचीही मागणी केली. आरोपी अधिकाऱ्यांकडून चौकशी प्रभावित होऊ नये, यासाठी अशी मागणी केल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. याबाबतचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
‘आम्ही पक्षपातीपणा, खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण गोष्टींना कठोर संघर्षांतून मिळवलेल्या लोकशाहीसोबत खेळू देणार नाही. फेसबुक या प्रकारच्या खोट्या आणि द्वेषपूर्ण बातम्या पसरवण्याचं काम करत असल्याचं डब्ल्यूएसजेने समोर आणलं आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी फेसबुकच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित करायला हवे;, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
‘भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजप आणि आरएसएस यांचं नियंत्रण आहे. या माध्यमातून ते खोट्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट पसरवून मतदारांची दिशाभूल करतात. अखेर अमेरिकेतील माध्यमांनी फेसबुकचा खरा चेहरा समोर आणला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.