केंद्र सरकार 20 जुलैपासून ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 कायदा लागू करत आहे. 1986 सालीचा जुना ग्राहक संरक्षण कायदा आता रद्द करून त्याच्या जागी हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे. या नवीन कायद्यामुळे ग्राहकांच्या हक्कात वाढ होणार आहे.
या कायद्याविषयी बोलताना ‘ग्राहक देवो भव’ हे मोदी सरकारचे धोरण आहे. या नव्या कायद्यामुळे ग्राहकाचे हित साधले जाणार असून यामध्ये ग्राहक सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे
नवीन कायदा "ग्राहक देवो भवः" या मूलभूत तत्त्वावर केंद्रित आहे जो आपल्या सर्वांना पंतप्रधान श्री @narendramodi जी यांनी दिलेला आहे: @raosahebdanve
— Office of Raosaheb Patil Danve (@DanveRaosaheb) July 18, 2020
रावसाहेब दानवे म्हणाले की, नवा कायदा संरक्षण कायदा हा ‘ग्राहक देवो भव’ या मूलभूत तत्त्वावर केंद्रित आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकाभिमुख असलेल्या या नव्या कायद्याची रचना करण्यात आली आहे. कायदा तयार करताना आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करण्यात आला आहे.
या कायद्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या कायद्यात असलेल्या अनेक त्रुटी नव्या कायद्यामध्ये दूर करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून व्यावसायिक तत्वांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या कायद्याची अंमलबजावणी करताना ग्राहकांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.